दिलासा! येस बँकेचे खातेदार आता काढू शकतात ५० हजारापेक्षा जास्त रक्कम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँकेच्या सर्व बँकिंग सेवेवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळं बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून ५० हजाराहून अधिक रुपये काढू शकतात. सोबतच त्यांना इतर बँकिंग सेवांचा सुद्धा पूर्ण वापर करता येणार आहे. १३ दिवसानंतर येस बँकेच्या सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत.

५ मार्च रोजी संध्याकाळी येस बँकेचे व्यस्थापकीय मंडळ आरबीआयने बरखास्त करून बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातलं होते. त्यानुसार बँकेच्या खातेदारांना ५० हजाराहून अधिक रक्कम काढता येत नव्हती. यानंतर, सरकारने बँकेसाठी नवीन योजना जाहीर केली आणि प्रशांत कुमार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. मंगळवारी संध्याकाळी प्रशांतकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की बँकेकडे रोख रकमेची कमतरता नसून सर्व एटीएम भरले आहेत.

प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार येस बँकेच्या एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस या सेवांसोबत सर्व ऑनलाइन सेवा उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. बँकेच्या एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता नाही. संध्याकाळी ६ नंतर ग्राहक एटीएम, डेबिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग आणि मोबाइल अॅप वापरुन सर्व सेवा वापरू शकतात.

दरम्यान, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी येस बँक ठेवीदारांचे भांडवल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ”मी सर्वाना आश्वस्त करत सांगतो की, भारतातील बँकिंग क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व बँका पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणत्याही ठेवीदारास आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.”

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment