उंडाळेतील युवकाच्या अपहरण प्रकरणात कोल्हापूर व सांगलीतून 10 जणांना उचलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
क्रिकेट खेळायला निघालेल्या युवकाचे कार व दुचाकी मधून आलेल्या टोळक्याने अपहरण केले होते. कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान, कराड तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तपास करून केवळ 48 तासांच्या आतच संशयित 10 जणांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.

अमित आनंदराव चव्हाण (रा. उंडाळे, ता. कराड) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मंदार भीमराव पाटील (वय 23, रा. निगवे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) श्रेणिक अशोक पाटील (वय 25) धैर्यशील राजाराम पाटील (वय 29 दोघेही, राहणार कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली), साहिल कादिर शेख व 21 राहणार बावडा, जिल्हा कोल्हापूर) अक्षय शेखर बागडे (वय 26 राहणार कसबा बावडा जय भवानी गल्ली कोल्हापूर), रोहन विजय गायकवाड (वय 23 राहणार कणानगर कसबा बावडा कोल्हापूर), ओंकार पांडुरंग रावळ (वय 23 राहणार नगवे दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर), मयूर प्रशांत गवळी (वय 24 राहणार कणा नगर कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर), विकास नरसु वेटाळे (वय 24 राहणार कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर), श्रीधर वसंत पाटील (वय 25 राहणार कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर) अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अमित चव्हाण यांचा भाऊ नितीन आनंदराव चव्हाण यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, उंडाळे येथील अमित चव्हाण हा स्पोर्ट्स साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करतो. त्यास क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. स्पोर्ट्स साहित्य विक्री व्यवसायामध्ये नुकसान झाल्याने तो अनेक लोकांचे पैसे देणे आहे. रविवार दि. 30 रोजी अमित चव्हाण हा महारुगडेवाडी (ता. कराड) येथे क्रिकेटचे सामने असल्याने टीम घेऊन गेला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महारुगडेवाडी येथील शशी तोडकर याने फोन करून नितीन चव्हाण यांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही लोकांनी अमितला जबरदस्तीने गाडीतून घेऊन गेले असल्याचे सांगितले. तर त्यानंतर उंडाळे येथील प्रज्वल पाटील यांनीही नितीन चव्हाण यांना हीच बाब सांगितली.

प्रज्वल पाटील व अमित चव्हाण हे दोघेजण मोटरसायकल वरून महारुगडेवाडीवरून उंडाळेकडे येत असताना मस्कराच्या लिंबाजवळ पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या लोकांनी अमित चव्हाण यांच्या मोटरसायकलला कार आडवी मारली. कारमधील काही लोकांनी खाली उतरून अमितला जबरदस्तीने कारमध्ये बसवून ती कार नांदगावच्या दिशेने गेली असल्याचे प्रफुल्ल पाटील यांनी नितीन चव्हाण यांना सांगितले. त्यानंतर नितीन चव्हाण यांनी अमित याचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद लागला. म्हणून नितीन चव्हाण यांनी मित्रांच्या मदतीने अमितचा त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही.

नितीन चव्हाण यांनी ही बाब बहीण सौ. ज्योती यांना सांगितली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौ. ज्योती यांनी अमितला फोन केला असता त्याने फोन उचलून मी बाहेरगावी आलो आहे. तुला उद्या सकाळी फोन करतो, असे अमितने सांगितले.
त्यानंतरही दुसऱ्या दिवशी सोमवार दि. 31 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सौ. ज्योती यांनी अमितला फोन करून तुम्ही कुठे आहे. घरी कधी येणार, असे विचारले असता मी उद्या येईन असे म्हणून अमितने फोन ठेवून दिला. त्यानंतर भाऊ नितीन चव्हाण यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावेळी अज्ञात सहा ते सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. दीपज्योती पाटील यांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेतला. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक संशयितांच्या मागावर पाठवून कोल्हापूर येथून आठ जणांना तर सांगली जिल्ह्यातील कामेरी येथून दोघांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांना कराड येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील करत आहेत.