BKC दसरा मेळाव्यासाठी सत्तारांच्या 500 गाड्या, भुमरेंचं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात एक वेगेळेच चित्र पाहायला मिळाले. यामध्ये ज्यांच्या गळ्यात औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची माळ पडली त्या संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदार संघात मात्र चिडीचीप शांतता असल्याचं पाहायला मिळालं तर ज्यांना पालकमंत्री पदासाठी डावलण्यात आले त्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र तब्बल 500 बस गाड्या घेऊन 25 हजार कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. त्यामुळे सत्तारांच्या 500 गाड्या भूमरेंचं काय अशी चर्चा संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाली आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे हे अलीकडच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेले चेहरे आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीत या दोन्ही नेत्यांचा महत्वाचा वाटा होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना कृषिमंत्री तर संदीपान भुमरे यांना रोजगार हमी योजना मंत्रिपद देण्यात आलं, पण खरी चढाओढ सुरू झाली ती औरंगाबादच्या पालकमंत्री पदासाठी. मात्र चढाओढीत संदीपान भुमरे यांनी बाजी मारली आणि औरंगाबाद सारख्या विभागीय जिल्ह्याचे पालकमंत्री पद संदीपान भुमरे यांनी आपल्या पदरात पाडून घेतले.

तर अब्दुल सत्तार यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले गेले, हे पालकमंत्री पद दिल्यानंतर अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांनी लावलेली ताकत पाहता अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करून आपल्या पदरात आणखी काहीतरी पाडून घेण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली त्या संदीपान भुमरे यांनी मात्र एकला चलो रे ची भूमिका घेऊन एकट्यानेच मुंबईला जाणे पसंत केले आहे.

अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जोरदार तयारी केली आहे. 8 दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार एसटीच्या 400 बसेस खाजगी 80 बसेस तर ट्रक टेम्पो आयशर अशी 20 एकूण 500 वाहने आरक्षित केली होती, प्रत्येक गावातून 100 या प्रमाणात मुंबईला जाण्यासाठी तब्बल 25 हजार माणसांची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल सत्तार यांनी 27 ते 30 हजार कार्यकर्ते सोबत घेऊन मुंबईला कूच केली आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या शेकडो एकर जागेवर मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांच्या सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळची ‘विशेष’ व्यवस्था अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

एका बाजूला अब्दुल सत्तार यांनी ही सगळी जबरदस्त तयारी केली असताना दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरे यांच्या गोटात मात्र पूर्ण शांतता दिसत आहे. पैठण मधून बस गाड्या किंवा वाहने निघाल्याचं समोर आलं नाही, किंवा कुठल्याही बस गाड्या किंवा वाहनांचे आरक्षण सुद्धा केले नव्हते त्यामुळे पालकमंत्री नक्की करतात काय अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती, एकट्या अब्दुल सत्तार यांनी एकट्या सिल्लोड तालुक्यातून 500 गाड्या मुंबईला नेल्या तर मग संपुर्ण जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असलेल्या संदीपान भुमरे यांनी एकही गाडी दसरा मेळाव्यासाठी का नेली नाही असा प्रश्न वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय