जाणून घेऊया सीताफळ लागवड आणि छाटणीचे तंत्र 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रामध्ये  जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिताफळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म मोलाचे आहेत. औषध कंपन्यांमध्ये कडवट औषध निर्माण करण्यासाठी सिताफळाच्या पानांचा वापर केला जातो. सिताफळाच्या बियांपासून तेल निर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो.  सीताफळाची भुकटी देखील आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरली जाते. आपण सीताफळाच्या लागवडीचे तसेच छाटणीचे तंत्र याबद्दल जाणून घेऊया.

सिताफळाच्या वाढीसाठी कोरडे व उष्ण हवामान फार उपयुक्त असते.  महाराष्ट्राचे हवामान हे सीताफळ लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. सीताफळ जेव्हा मोहराच्या काळात असते तेव्हा कोरडी हवा असणे फार आवश्यक असते, पावसाळा सुरू झाल्याशिवाय सीताफळाला फळधारणा होत नाही. जास्त थंडी व अति धुके या पिकाला अपायकारक असू शकते. अगदी खडकाळ जमिनीपासून ते माळरानामध्ये सिताफळाचे झाड वाढू शकते. जशी माळरानांवर सिताफळाची वाढ होते अगदी शेवाळ युक्त जमिनीतही सिताफळाची वाढ चांगली होते. तसेच गाळ मिश्रीत, लाल जमिनीत सिताफळाची वाढ चांगल्या प्रकारे होते. मात्र काळी, पाणी साठवून ठेवणारी जमीन या फळ झाडाला अयोग्य ठरते.

सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात ०.६० बाय०.६० बाय आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून खोदावेत. ते पाच बाय पाच मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. म्हणजे या अंतराने खड्डे केल्यास एक हेक्टर मध्ये ४०० झाडे बसतात आणि लागवड ४ बाय ४ मीटर वर केल्यास ५० टक्के अधिक झाडे बसतात.  चांगल्या प्रकारचे शेणखत, सिंगल सुपर फास्फेट, पोयटा माती सह पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावेत. बांगडी पद्धतीने थायमेट १० जि वापरावे. यासाठी हेक्टरी  अर्धा टन शेणखत, २०० किलो सिंगल सुपर फास्फेट ची हेक्टरी आवश्यकता असते. अशाप्रकारे खड्डे भरल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळ्यात झाडांची लागवड सुरू करावी.

चांगले उत्पन्न येण्यासाठी पावसाळा सुरू झाला की सीताफळाच्या झाडाला दोन-तीन पाठवा चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे फायदेशीर ठरते. लागवडीनंतर साधारणतः तीन वर्षापर्यंत पहिल्या वर्षी १२५ ग्राम नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी खताचा, दुसऱ्या वर्षी अडीचशे ग्रॅम नत्र, अडीचशे ग्राम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश कधी खतांचा, तिसऱ्या वर्षी ३७५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश यांचा पुरवठा करणे योग्य ठरते. आणि पुढील पाच वर्षापर्यंत प्रत्येक झाडाला पाच ते सात पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया देणे योग्य ठरते. तशी सीताफळाच्या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. जेव्हा फळे पक्व होण्याची वेळ असते, तेव्हा एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळांचा आकार व दर्जा वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाण्याचा ताण जास्त पडला तर १५ते २० दिवसांनी पाणी द्यावे. निव्वळ पावसाच्या पाण्यावरही चांगले उत्पन्न देऊ शकते. परंतु पहिल्या तीन-चार वर्षात जर पुरेसे पाणी दिले तर झाडांची वाढ चांगली होते.

सिताफळाची लागवड केल्यानंतर जर काही रोपे मेली तर एक महिन्याच्या आत नांग्या भरून घ्याव्यात. सीताफळाची बाग ही नेहमी तणमुक्त असणे आवश्यक असते. रोपे लहान असताना पावसाने ताण पडला तर अधूनमधून पाणी देत राहावे. झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करणे आवश्यक असते. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्या लागतात. कोणत्याही फळ पिकामध्ये छाटणीला फार महत्व असते. जर छाटणी केली नाही तर त्याची उत्पन्न क्षमता कमी होते. त्याच्यामुळे झाडाला व्यवस्थित आकार पण येतो व त्यामुळे बागेमधील आंतरमशागतीची कामे चांगल्या पद्धतीने करता येतात. साधारणता झाडाची पानगळ झाल्यानंतर छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करणे कधीही योग्य ठरते. साधारणतः पहिली छाटणी ही बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर केले जाते. जानेवारी ते मे मध्ये उन्हाळी बारा साठी पाणी सुरू करण्यात येते. जून २५ ते २७  नंतर झाडांना फळे असताना दुसरी छाटणी करावी. त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसांनी झाडाला नवीन पालवी फुटते व त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात काढणीस येतात, एका झाडापासून दोनवेळा फळे घेणे शक्‍य असते. फळे साधारणतः सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत बारीक,  रोगग्रस्त व वेळ वाकडी फळे विरळणी करून काढून घ्यावेत.  अशाप्रकारे सीताफळाची तंत्रज्ञान शुद्ध लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment