अखेर ‘त्या’ प्रकरणाबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली भारतीय संघाची माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दल शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली.

भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसल्याने साऱ्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं.

या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागत अशा चाहत्यांची गय केली जाणार नसल्याचं सांगितलं. “भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो”, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment