‘वाजपेयी-अडवाणी नसतानाही पक्ष थांबला नाही; नाथाभाऊ जाण्यानेही भाजप थांबणार नाही’- रावसाहेब दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । भाजपचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचं काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही. त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या जाण्यानेही महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले. निसर्गाला पोकळी मान्य नसते. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. नेता हा अशा कार्यकर्त्यांमुळेच मोठा होतो. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वाची उणीव जाणवणार नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

चार दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा केला. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व नगरमध्येही आमच्याकडे सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचं कसं होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपमध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंत कोण?, असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने भाजप पक्ष थांबलेला नाही. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष कधीच थांबत नाही. भाजपकडे असंख्य कार्यकर्त्यांची फळी असल्याने नेतृत्त्वाची ही पोकळी भरुन निघेल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment