गांधी जयंतीला राहुल यांची वर्ध्यात पदयात्रा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा प्रतिनिधी। महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या समारोपाचे; तसेच महाराष्ट्र-हरियाणातील विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून पदयात्रा काढणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा हरियाणामध्ये, तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीत पदयात्रा काढणार असून काँग्रेस पक्षाने गांधी जयंती समारोप देशव्यापी कार्यक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजनवासात गेलेले राहुल गांधी वर्ध्यातील पदयात्रेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाल्यामुळे राहुल गांधी यांची पदयात्रा निवडणूक प्रचाराचाच भाग ठरणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाबतीत दाखवलेल्या राजकीय ढिसाळपणाची पुनरावृत्ती होऊन महात्मा गांधींच्या वारशावर मोदी-भाजपने ताबा मिळवू नये, म्हणून काँग्रेसने १५० व्या जयंती समारोपाचे कार्यक्रम गंभीरपणे आयोजित करण्याचे ठरविले आहे.दरम्यान त्यांच्या या पदयात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेस मध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसस साठी ही पदयात्रा महत्वपूर्ण ठरणार आहे. या पदयात्रेसाठी काँग्रेस सज्ज झाले अजून प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. मोठे नेते या यात्रेसाठी येणार असून कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment