मुंबई : आज लागलेल्या जिल्हा परिषदेच्या निकालात धुळे जिल्हा परिषद वगळता इतर पाचही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे.पालघर, नागपूर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. या सहा जिल्हा परिषदांमध्ये मिळून 332 जागा होत्या त्यापैकी भाजपला सर्वाधिक 103 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे.
धुळ्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र तिकडे नागपूरमध्ये भाजपचा गड काँग्रेसने उद्ध्वस्त केला आहे. पालघरमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान 23 जागा मिळाल्या. पण इथे महाविकास आघाडीचा विजय झाला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला. तर वाशिममध्येही वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली.
6 जिल्हा परिषदेच्या एकूण 332 जागांपैकी भाजपला 103 जागा मिळाल्या.
6 जिल्हा परिषदेतील चित्र – एकूण जागा – 332
भाजप विजयी – 103
काँग्रेस विजयी – 74
राष्ट्रवादी विजयी -43
शिवसेना विजयी -48
इतर विजयी – 61