मुंबई : तृतीयपंथीयांसाठी “कल्याण मंडळ” येत्या वीस दिवसात स्थापण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे या गेले अनेक वर्षे तृतीयपंथीय नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होत्या. आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
मागील सरकारने कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु आजवर त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नव्हती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी येत्या 20 दिवसातच मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या “कल्याण मंडळात” फक्त शासकीय अधिकारी /कर्मचारीच असणार नाहीत तर तृतीयपंथी वर्गाच्या नागरिकांना देखील या मंडळात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.यामुळं या नागरिकांच्या मूळ समस्या समजायला मदत होणार आहे.
तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळ २० दिवसात स्थापण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. खा. @supriya_sule ताई गेली अनेक वर्षे तृतीयपंथीय तसेच वंचित महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळीला बळ देत आहेत.त्यांच्याच पुढाकाराने आजची बैठक झाली. pic.twitter.com/6lrT6s188m
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 7, 2020
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न, समस्या, अडचणी आहेत. याआधीच कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय होऊनही अद्याप अस्तित्वात न आलेले मंडळ लवकरच अस्तित्वात येईल. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून आज तृतीयपंथीयांच्या कल्याणासंदर्भात एक ठोस आणि महत्वाचा निर्णय घेऊ शकलो, याचं समाधान आहे.