शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

४ वर्ष दुष्काळ आणि १ वर्ष अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भाजपने केल्याचं फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेसोबत, राष्ट्रीय महामार्गाचं काम, उद्योगधंद्यांची प्रगती यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. महायुतीच्या विजयाची माहिती देत असतानाच उमेदवार निवडीच्या स्ट्राईक रेटचाही पुनरुच्चार फडणवीसांनी केला.

सरकार बनवण्याचे सगळे मार्ग खुले आहेत या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर ‘धक्कादायक’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागील १५ दिवस हे राज्याच्या राजकारणासाठी दुर्दैवी होती असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीच नव्हती असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मी उद्धव ठाकरेंना चर्चेसाठी अनेक फोन केले पण त्यांनी फोन घेतलेच नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता, पण आमच्याशी बोलायला नव्हता याचं अतीव दुःख असल्याचं सांगितलं. शरद पवारांनीही सेना-भाजपने सरकार स्थापन करावी असं सांगीतल असताना शिवसेना मात्र त्याच्याशीच चर्चा करत राहिली या घटनेची खंत फडणवीसांनी व्यक्त केली.

मागील १५ दिवसांत अत्यंत खालच्या पातळीवरची टीका शिवसेना नेत्यांनी केली. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा मान त्यांनी राखला नाही हे दुर्दैवी असल्याचंही फडणवीस म्हणाले. शिवसेना ज्या भाषेत बोलली त्या भाषेत आम्हालाही बोलता आलं असतं पण आम्ही आमच्या मर्यादेत राहिलो. आमदार फोडण्याचा गलिच्छ आरोप आमच्यावर लावण्यात आला असून असा आरोप करणाऱ्यांना खुलं आव्हान फडणवीसांनी दिलं.

Leave a Comment