महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय चित्र आहे. या स्थितीत राज्यसभेच्या निवडणुका होत असल्याने भाजपसाठी या निवडणुकीत मोठे आव्हान असेल असे दिसत आहे.

महाविकास आघाडी महाराष्ट्रातील ७ पैकी ४ जागी विजय मिळवू शकते, इतकं संख्याबळ आघाडीतील तिन्ही पक्षांकडे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असावा व चौथी जागा एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला द्यावी, असे मत शिवसेनेच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात आले आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र हा फॉर्म्युला मान्य नसल्याची चर्चा आहे.

येत्या ३० मार्चपूर्वी ही निवडणूक पार पाडायची असल्याने मतदानासाठी आयोगाने २६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. ६ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असेल. १६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून १८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असेल. या सर्व जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment