५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । शुभम भोकरे

इतर राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रश्न आणि मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नांवर प्रचार पेटवत असताना राज ठाकरे यांनी राज्यातील विविध घटकांच्या समस्या लोकांसमोर मांडत युती सरकारवर घणाघात केला. आरेमधील वृक्षतोड, शिवरायांचे गडकिल्ले, शहरांत पडलेले खड्डे, शेतकरी आत्महत्या, पीएमसी बँकेतील घोटाळा, आर्थिक मंदीच्या काळात लोकांचे गेलेलं रोजगार या प्रश्नांची माहिती देत युती सरकारला राज ठाकरे यांनी चांगलंच धारेवर धरलं. अर्धवट आंदोलने करणं हा आमचा पिंडच नाही. जी आंदोलने केली ती पूर्णत्वास नेल्याचं सांगत महाराष्ट्रातील ७८ टोलनाके बंद केल्याचा दाखलाही राज ठाकरेंनी दिला. दहिसर येथे आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या अडचणी बघून लगेच आंदोलनात उड्या घेतल्या आहेत. रझा अकादमीवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मनमानीला अटकाव बसावा म्हणून पोलिसांची बदली करण्याच्या सूचना आपणच पोलीस महासंचालकांना केल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना जागा मिळावी, हिंदू समुदायाच्या सण-समारंभांना परवानग्या मिळाव्यात म्हणून मनसे सैनिकांनी प्रयत्न केले याचं उदाहरणही ठाकरे यांनी यावेळी दिलं. लोकंच जर थंड असतील, तर अशा लोकांचं नेतृत्व करायला आपल्याला बिलकुल आवडणार नसल्याचं सांगत मराठी माणसाच्या अस्मितेला संपवण्याचा सरकारचा डाव आहे त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी देण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

राज ठाकरे यांचे दहिसर येथील भाषण ऐकण्यासाठी खालील व्हिडियो पहा.

https://www.youtube.com/watch?v=CZLQm95KQ9s

Leave a Comment