चंद्रकांत पाटील सैरभैर, त्यांना मानसिक उपचाराची गरज : अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप करत आहेत. आज सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून “चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचे नैराश्य आलेले आहे. पुन्हा सत्ता मिळत नसल्याची ते हतबल झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे,” असे चव्हाण यांनी ट्विट केले आहे.

भाजपच्यावतीने आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनेक घणाघाती आरोपही केले. यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा भाजप व चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

” मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे.” असं ट्विट चव्हाण यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment