काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच चित्ते भारतात; बाळासाहेब थोरातांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. मात्र यावरूनही श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच हे चित्ते भारतात आले असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचा घटनाक्रमच सांगितला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत म्हंटल की, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली UPA सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी #ProjectCheetah ची सुरुवात केली. तत्कालीन वने आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता चित्ते भारतात येत आहेत ही आनंदाची बाब आहे. यासोबत त्यांनी जयराम रमेश यांचा चित्त्यांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

प्रोजेक्ट चीताचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार झाला. मनमोहन सिंह सरकारने त्याला मान्यता दिली. एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउटरीच सेंटरमध्ये गेले. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रकल्पाला स्थगिती दिली. २०२० मध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. आता चित्ते आणले जात आहेत, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. यामुळे चित्त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे.