पुणे । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत विरोधकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आग लागलेल्या इमारतीत बांधकाम सुरु होतं त्यातूच इलेक्ट्रिक बिघाडामुळं आग लागली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
सीरामच्या आगीमागे विरोधकांनी घातपाताचा संशय वर्तविला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइकवगैरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वगैरे प्राप्त असेल, माहिती असेल जर जरुर द्यावी. त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज आहे,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यासोबत माझं अद्याप काही बोलणं झालेलं नाहीये. मी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली आहे. सर्व शांत झाल्यावर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कोणालाही फोन करुन त्रास दिलेला नाही. आग विझवण्याचं काम पूर्ण झालं की आपल्याला माहिती मिळेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचं कौतुकही केलं आहे. ‘अग्निशमन दलाच्या जवानांनी फार मोलाचं काम केलेलं आहे. जिथे जिथे आग लागते, तिथे हे जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जातात. जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतात, मालमत्तेचे रक्षण करतात, किंबहुना आतमध्ये जे अडकलेले असतात त्यांना ते वाचवत असतात,’ असं ते म्हणाले आहेत. ‘देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती,’ अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’