जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही; अशोक चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. त्यावरून राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम करू नका असेही अशोक चव्हाण यांनी म्हंटल. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विट्स केले आहेत.

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य असल्याने आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही. पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. शासकीय नोंदीमध्ये मृतकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या डझनोगणती चिता लपवण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही.

अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाही, जागा नाही म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडून देण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची, संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना दिली नाही. हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फडणवीस यांनी एखादे खरमरीत पत्र लिहिले तर त्यातून तिथल्या राज्य सरकारांच्या कामात सुधारणा होईल आणि कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.

देशाच्या कोरोना परिस्थिताला जणू महाराष्ट्रच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते. भाजपवरील महाराष्ट्रद्रोही हा ठपका ते या पत्रातून खरा ठरवत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्याबद्दल चुकीची प्रतीमा निर्माण करू नका असेही अशोक चव्हाण यांनी म्हंटल.

खा. राहुलजी गांधी यांनी गेल्या वर्षी वेळीच इशारा दिला होता. पण भाजपने त्यांची थट्टा केली. ‘नमस्ते ट्रंप’ केला. मध्य प्रदेशातील सरकार पाडलं.

यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केला. कोरोनाऐवजी निवडणुकीला प्रथम प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण फडणवीस यांनी केले पाहिजे, अशी गंभीर टीका चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Comment