सोनिया गांधींची घोषणा! काँग्रेस उचलणार मजुरांचा तिकीट खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत लाखो मजूर अडकून पडले. लॉकदौंमुळे काम बंद आणि घरी जाण्यासाठी कुठलंही प्रवासाचं साधन नाही. अशा कात्रीत अडकलेल्या मजुरांसाठी आता 40 दिवसांनी विशेष रेल्वेची व्यवस्था केंद्राकडून करण्यात आली. मात्र, आधीच लॉकडाऊनचे चटके सोसत असलेल्या या मजुरांना ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेचा खर्च भरावा, असे निर्देश मोदी सरकारकडून देण्यात आले आहेत. यावर विरोधकांसोबत अनेकांकडून चांगलीच टीका होत आहे. श्रीमंतांचा प्रवास मोफत मात्र गरीबांकडून प्रवासासाठी पैसे वसूल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. सोबतच, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांच्या घरी परतण्यासाठीचा रेल्वे तिकिटाचा खर्च काँग्रेस करणार असल्याचं सोनिया गांधींनी जाहीर केलं.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर मजुरांच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले. ‘परदेशात अडकलेल्या भारतीयांना मोफत मायदेशात आणण्यात आलं पण गरीब कामगारांकडून मात्र तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत. अशावेळी काँग्रेस कमेटीनं प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च स्वत:हून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील’ काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलरवर जाहीर करण्यात आलेल्या सोनिया गांधींच्या वक्तव्यात म्हटलं गेलं आहे.

‘श्रमिक आणि कामगार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळेच देशाचा पाया रचला गेलाय. केवळ चार तासांच्या नोटीसवर लॉकडाऊन सुरू झाल्यानं लाखो श्रमिक आणि कामगार आपल्या घरी परतू शकले नाहीत. १९४७ च्या विभाजनानंतर देशात पहिल्यांदाच अशी हृदयद्रावक परिस्थिती पाहायला मिळाली, जिथं हजारो श्रमिक आणि कामगारांवर शेकडो किलोमीटर पायीच आपल्या घरी परतण्याची वेळ आली. त्यांच्याकडे ना धान्य, ना पैसा, ना औषध, ना साधनं, पण केवळ आपल्या कुटुंबात परण्याची आस… त्यांची व्यथा विचार करूनच मनाला कापरं भरतं, आणि त्यांचा दृढ निश्चय आणि संकल्प प्रत्येक भारतीयाला कौतुकास्पद वाटतो. पण देशाचं आणि सरकारचं कर्तव्य काय आहे? आजही लाखो श्रमिकांना आणि कामगारांना संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून आपल्या घरी परतायचंय, पण साधनंही नाहीत आणि पैसेही…’ असं म्हणताना सोनिया गांधी यांनी गरीबांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment