संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दिलीप घोष म्हणले कि, ”काही दुर्देवी घटना नक्की घडल्या आहेत, मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवता येणार नाही. श्रमिकांच्या प्रवासासाठी रेल्वे त्याच्याकडून सर्वोत्तम सेवा देत आहे. काही जणांचे मृत्यू झाले आहेत पण ते वेगवेगळ्या घटनांमध्ये झाले आहेत,” असं मत व्यक्त केलं. गुरुवारी घोष यांनी व्यक्त केलेल्या या मतावरुन विरोधकांनी आता हे वक्तव्य संवेदनशून्य असल्याची टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“प्रवाशांना मदतीची गरज असताना रेल्वेने कशाप्रकारे उत्तम प्रकारे काम केलं आहे याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. काही छोट्या घटना घडल्या आहेत मात्र त्यामुळे रेल्वेसेवा बंद करता येणार नाही,” असं खासदार असलेल्या घोष यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. घोष यांच्या या वक्तव्यावरुन पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि माकपने (एम) (सीपीआय एम) आक्षेप नोंदवला आहे. भाजपा नेत्यांनी मजुरांना होत असणाऱ्या अडचणींबद्दल संवदेनशील असण्याची गरज आहे असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

“कोरोना संकट आणि लॉकडाउनचे केंद्र सरकारने नीट नियोजन न केल्याने स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू होत आहे असं असतानाच भाजपा नेते अशापद्धतीचे उद्धट वक्तव्य करत आहेत जसं काही काही घडलचं नाही. आमच्याकडे बोट दाखवण्याआधी दिलीप घोष यांनी जरा संभाळून आणि नीट बोलावं,” असा टोला तृणमूलच्या खासदार सौगाता रॉय यांनी घोष यांना लगावला आहे.

माकपचे सदस्य मोहम्मद सलीम यांनीही रॉय यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “घोष यांच्यासारखे नेते भाजपाच्या आभासी जगात राहत आहेत. ज्यांना भाजपाच्या काळात सर्व काही चांगले होत असल्याचं वाटत आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे मोदी सरकार लोकांचे प्राण वाचवण्यात अपयशी ठरत असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारमुळे गोंधळ निर्णाण झालेला असताना अशाप्रकारे दिशाभूल करताना भाजपा नेत्यांना लाज वाटली पाहिजे,” असं सलीम यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment