कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिंदूर – उमराणी रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर बाबु यादव यांची अडीच एकर शेती आहे. एका एकरात द्राक्षे बाग तर एकात इतर पीक ते घेतात. हे कुटुंब संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे. त्यांनी उमराणी सर्व सेवा सहकारी सोसायटीकडून चार लाख, अथणी येथील खाजगी सावकाराकडून तीस हजार व श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, जत यांच्या कडून पन्नास हजार, अशी चार लाख ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

दरम्यान, श्री विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने बाबु यांना दि.१६ मे रोजी नोटीस बजावली होती. मात्र, पैशाची जुळवा जुळव होत नाही, बँकेचे पैसे कोठून भरायचे, याच विवंचनेत यादव यांनी शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. कुटुंबियांना बाबू हे कोठे दिसत नसल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा शेतामध्ये आढळला. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Leave a Comment