‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

कृष्णा कारखान्याचा सभासद असणाऱ्या शेरे येथील पांडुरंग काकासाहेब निकम या युवा शेतकऱ्याने जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्याच्या या ऊसक्षेत्राला चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन, त्याच्या कार्याचे कौतुक केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, या उद्देशाने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रतिएकरी 100 टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला असून, गेल्या 4 वर्षात या योजनेत 9 हजार 499 शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला.

शेंरे येथील पांडुरंग निकम यांनी देखील या योजनेत सहभागी होत, आपल्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली. पण 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे त्यांचे ऊसक्षेत्र काही काळ पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे लावलेल्या ऊसाचे पुढे काय होईल, या एकाच भितीने ते त्रस्त होते. पण योजनेतील सहभागामुळे कारखान्यातील अधिकाऱ्यांनी पूर ओसरल्यानंतर निकम यांच्या ऊसपीकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे केले. तसेच ऊसविकास विभागातील सर्कल ऑफिसर व शेती मदतनीस यांच्यामार्फत त्यांना वेळोवेळी बांधावर जाऊन मार्गदर्शन करत, कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात आल्या. याचाच परिपाक म्हणून पांडुरंग निकम यांनी प्रतिएकरी 105 मेट्रीक टनाहून अधिक ऊस उत्पादन घेतले.

निकम यांच्या ऊसक्षेत्राची पाहणी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी निकम यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना आखली असून, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. येत्या काळात सर्व शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करून, त्यांना कारखानातर्फे सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे. संकटाच्या काळातही पांडुरंग निकम या युवा शेतकऱ्याने घेतलेल्या विक्रमी उत्पादनाचा आदर्श घेऊन, अन्य शेतकऱ्यांनीही आपापल्या शेतीक्षेत्रात नाविण्यपूर्व कल्पनांचा अवलंब करावा.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, माजी सरपंच नितीन गावडे, पै. राहुल निकम, समीर पाटील, कॉम्रेड अधिकराव निकम, शंकरराव निकम, माणिकराव निकम, मोहन निकम, सतीश निकम, प्रकाश निकम, निवास निकम, संभाजी निकम, आनंदराव निकम, लक्ष्मण सावकर, आण्णा खरात, संपतराव निकम, बाजीराव निकम, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, सहायक शेती अधिकारी अजय दुपटे, अमोल साठे, विक्रम पाटील यांच्यासह शेरे गावातील प्रगतीशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment