‘सरकारनं ठरवलं तर सारं काही शक्य, पण दुर्दैवानं मी मुख्यमंत्री पदावर राहिलो नाही’- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का? अशी विचारणा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘सरकारनं ठरवलं आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे. पण दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. मुख्यमंत्री पदासाठी राज्यात ऐतिहासिक अशी सत्तापालट उभ्या महाराष्ट्राने पाहिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना आणि भाजपचा घरोबा होता. मात्र, लोकसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. यावेळी एकमताने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आणि भाजपला जास्त मतं असूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली.

यानंतर एकच राजकीय वादळ राज्यात पाहायला मिळालं. त्यामुळे मी दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही. पण सरकारनं ठरवलं आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (bjp devendra fadnavis statement on cm post criticized on uddhav Thackeray)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री असताना राज्यात अतिवृष्टीचं संकट ओढावलं होतं. त्यावेळी फडणवीसांनी हेक्टरी 10 हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची मागणी केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत पुरेशी नसल्याचं सांगितलं होतं. तोच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे जुने व्हीडिओ दाखवत आपल्या वक्तव्याची आठवण करुन दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वत:च केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची नामी संधी चालून आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एरवीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापणीला आलेली पिके आणि कापून ठेवलेली पिके दोन्ही पाण्यात भिजली. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये गुरांना देण्यासाठी चाराही उरलेला नाही, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment