कोणतीच परीक्षा न देता पिंजऱ्यात बसलेल्यांना सर्टिफिकेट तरी कसं देणार? नारायण राणेंची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होत. यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावर आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली. कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
राम कदम यांनीही जोपर्यंत पालघर हत्याकांडाचं प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असं स्पष्ट केलं. आज या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता संघर्षाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. या सरकारला साधूंचा आक्रोश ऐकू येत नाही. आम्हाला हा आक्रोश ऐकू येतोय. म्हणूनच ज्या ठिकाणी साधूंची हत्या झाली. त्या ठिकाणी दिवा पेटवून या साधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही जात होतो. तरीही आम्हाला मज्जाव करण्यात आला. दिवा पेटवणं हा काही गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच 212 दिवस झाले तरी सरकार या प्रकरणाचा न्याय करू शकली नाही. पोलीसही सरकारच्या दबावात आहेत. त्यामुळेच हे प्रकरण हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली. आज संघर्ष सुरू झाला. आता रस्त्यावरचा संघर्ष करू. आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (narayan rane taunt cm uddhav thackeray over hindutva)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment