‘एक राजा बिनडोक, तर दुसऱ्या राजाचा आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर भर; प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर”, असं आंबेडकर म्हणाले.

“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपानं राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले,”काल मराठा आरक्षण समितीमधील सुरेश पाटील यांनी मला फोन करून, १० तारखेच्या मोर्चा आणि बंदला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. त्या मागणीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच मराठा आरक्षण हे वेगळे असून, ओबीसी समाजाचे देखील आरक्षण वेगळे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या राहतील, हे लक्षात घेऊन, ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी होणार नाही. याबाबतची दक्षता सुरेश पाटील यांनी घ्यावी,” असं आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वातावरण बिघडताना दिसतेय. वेगवेगळ्या मराठा संघटना आक्रमक होताना दिसतेय. त्यांच्यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रील वातावरण बिघडू नये यासाठी आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आरक्षण कोणाला द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला आहे, असंही आंबेडकर म्हणाले. “सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता, कुठे तरी सामंजस्य बिघडताना दिसत आहे. त्यावर मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन्ही पक्ष ठामपणे राहिल्यास, राज्यातील सामंजस्य आणि शांततेचं वातावरण निश्चित राहिल,” अशी असं आंबेडकर म्हणाले.

एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणारे मराठा नेते मराठा आरक्षणाच्या पायावर धोंडा पाडून घेतायत. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. एमपीएससीची परीक्षा हा सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, असं आंबेडकर म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment