‘मी आकडे लावायला किंवा सांगायला आलेलो नाही, मदतीसाठी आलोय’; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी काटेवाडी गावातील शेतकऱ्यांंशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करेल, असे सांगितले. पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात निर्णय घेऊ. पण आता मी आकडे लावायला किंवा सांगायला आलेलो नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नुकसानभरपाईसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यास नकार दिला. (CM Uddhav Thackeray osmanabad Visit)

तुम्ही मला फार मोठ्या अपेक्षेने भेटायला येत आहात. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी आता तुमच्यासमोर मदतीचे काहीही आकडे सांगणार नाही. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी तुमचं आयुष्य उभारायला पूर्ण ताकदीने मदत करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. मी यापूर्वी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. आपली ओळख जुनी आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्यावर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येऊन पडली. यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे, केवळ तुमच्याचा आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

यंदाच्या वर्षाची सुरुवात कोरोनाच्या संकटाने झाली. यानंतर पाऊस जातोय असं म्हणत असतानाच जोरदार तडाखा बसला. परतीच्या पावसाने सगळे काही हिरावून नेले. मी या सगळ्याची माहिती घेतली आहे. वेधशाळेच्या लोकांशीही माझे बोलणे झालेय. आता परतीच्या पावसाचा धोका टळला असला तरी ग्रामीण भागात सात ते आठ दिवस वीजांचा मोठ्याप्रमाणावर कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बळीराजाला दिली.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment