उद्धव ठाकरेंनीच माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकरांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन सोडत शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच कीर्तिकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला तिकीट मिळाले, असा गंभीर आरोप कीर्तिकर यांनी केला आहे.

खा. गजानन कीर्तिकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेली 56 वर्ष झाली शिवसेनेसोबत आहे. पक्षातील एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळालेली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 2004 मध्ये माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला. व्हि के सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर आहे. त्याचा भाऊ रमेश सिंह आहे. त्याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची गुफ्तगू सुरू होती. काय गुफ्तगू सुरू होती मला माहीत आहे. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिले नाही. मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिले.

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी 2009 मध्ये माझा पत्ताच कट केला. त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. सुनील प्रभू म्हणून माझा पीए आहे. त्याला सारखं बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही. तू कामाला लाग असे ठाकरे सांगायचे. मला शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो. पण आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. 40 आमदार गेले. 15 बाकी आहेत. 12 खासदार गेले. मी 13 वा गेलो. पाच बाकी आहेत. समेट घडवावा. भाजपसोबतची नैसर्गिक युती कायम ठेवावी,असे कीर्तिकरांनी सांगितले.

म्हणून एकनाथ शिंदेंच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय

यावेळी कीर्तिकरांनी शिवसेना सोडून शिंदे गटात दाखल होण्याचे कारण सांगितले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या जात असलेल्या काही चुकीच्या गोष्टीमुळे मी ठरवले. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षाशासोबत वाटचाल होत असेल तर शिवसैनिकांना धोकादायक आहे. शिवसेनेच्या भवितव्याला धोकादायक आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला, असे कीर्तिकर यांनी सांगितले.

शिवसेनेत आमचा अपमान

यावेळी कीर्तिकर म्हणाले, शिवसेनेत आमचा अपमान होत होता. 2019 मध्ये आम्ही एनडीएसोबत होतो. आम्हाला मंत्रिपद मिळाले पण ते अरविंद सावंतला देण्यात आले. असे म्हणत कीर्तिकरांनी ठाकरेंना सवाल केला. तुमची खासगी माणसं आणि तुमच्या मर्जीतल्या माणसाला दिले. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा सवाल त्यांनी केला.