”अशी वेळ कोणावरही न यावी”– हरभजन सिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक वर्षी IPL मध्ये दमदार कामगिरी करूनही हरभजन सिंगला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराज सिंगने गेल्या वर्षीच निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच त्याला निरोपाचा सामना खेळण्याची देखील संधी मिळाली नाही. BCCI कडून मी कोणत्याही कार्यक्रमाची अपेक्षा ठेवली नव्हती, असेही युवराजने मागे स्पष्ट केले होते. याचविषयी बोलताना, टीम इंडियातील अनेक माजी खेळाडूंना निरोपाचा सामना खेळायला मिळायला हवा होता, मात्र त्यांच्यावर अन्याय झाला, अशा आशयाचे मत हरभजनने व्यक्त केले आहे.

“मी खेळलेल्या माझ्य शेवटच्या एकदिवसीय मालिकेत मी सहा बळी टिपले होते. आम्ही ती मालिका हरलो, त्यानंतर मला पुन्हा टीम इंडियातून खेळायची संधी मिळाली नाही. त्यावेळी माझे नशीब मला साथ देत नव्हते, हे त्यामागचे एक कारण असू शकेल. पण विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांसारख्या अनेक खेळाडूंना निरोपाचा सामना खेळायला मिळायला हवा होता. जर आपणच आपल्या खेळाडूंचा आदर करत नसू, तर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही बाहेर त्यांचा कोणीही आदर करणार नाही. मात्र यावेळी माझ्याबाबतीत जे झालं, ते इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये, असंच मला वाटतं”, असं स्पष्ट मत समालोचक आकाश चोप्रा बरोबरच्या यु ट्यूब चॅनेलवर हरभजनने व्यक्त केलं.

याच शो मध्ये हरभजनने संघातील निवडीचा आपला किस्सा सांगितला. तेव्हा हरभजनला एका सराव सत्रादरम्यान नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि त्याने संधीचं सोनं केलं होतं. हरभजन म्हणाला, “गोलंदाजीतील ‘दुसरा’ या चेंडूमुळे खरं तर मला संघात संधी मिळाली. मोहालीच्या मैदानावरील कसोटी सामन्यातील एका दिवशी नेट्समध्ये सराव सुरू होता. सराव सत्र जवळपास संपत आलं होतं. तेव्हा अचानक कर्णधार अझरूद्दीनने मला गोलंदाजी करण्यास सांगितले. “मी जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी गेलो तेव्हा सचिन, अझर या साऱ्यांचा फलंदाजीचा सराव संपलेला होता. त्यावेळी अझरूद्दीने जेवत होता तर सचिन माझ्या बाजूच्याच नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. आणि माझ्यासमोर वेगवान गोलंदाज देबाशिष मोहन्ती फलंदाज म्हणून उभा होता. मी त्याला सात ते आठ चेंडू टाकले, त्यातल्या चार-पाच चेंडूंवर तो बाद झाला. तो मोहन्ती होता, सचिन नव्हता; त्यामुळे त्याला बाद करणं फारस कठीण नव्हतं. पण माझी गोलंदाजी पाहून अजय जडेजाने अझरूद्दीनला माझ्या त्या कामगिरीबद्दल सांगितलं. सचिननेही मला तिथेच शुभेच्छा देत खेळावर पूर्ण लक्ष ठेवण्यास सांगितलं. आणि त्या नंतर वर्षभरातच मी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले”,हा किस्सा हरभजनने यावेळी आकाश चोप्राला सांगितला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment