व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आपणांस माझं कळकळीचे आवाहन की…राजेश टोपेंच रुग्णालयातुन महाराष्ट्राच्या जनतेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर जनतेची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला संभोधित केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने पत्र लिहुन आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागील आठवड्यात करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असताना राज्यात करोनाचं संकट पुन्हा बळावलं आहे.

करोना आणि लॉकडाउनचं संकट ओढवण्याची शक्यता असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. “गेल्या वर्षभरापासून आपण करोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु करोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने,” असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.