भाजप नेते रेमडेसिवीर औषध कसं खरेदी करतात?, नवा कायदा आलाय का?: जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यसरकारला, स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारे रेमडेसिवीरसारखे औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात?, नवीन कायदा आला आहे का?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात या भाजपाच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दरम्यान, साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे कौतुक देखील केले आहे. पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले आहे, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत, असे म्हटले होते. तसेच काही दिवसापूर्वी भाजपचे नेते दमणला जाऊन आले आणि ५० हजार रेमडेसिवीरची इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रात वाटू, असे ट्वीट केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment