…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून देतील कळणारही नाही, हा माझा अंदाज खरा ठरणार आहे,” असे जलील यांनी म्हंटले आहे.

खा. जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. त्यात त्यांना यश मिळाले आहे.

यावेळी औरंगाबाद महापालिकेत महापौरपदाबाबत खा.जलील यांनी मोठे विधान केले. या ठिकाणी पुढचा महापौर हा एमआयएमचाच होणार आहे. राजकीय स्वार्थापोटी शहराचं नामांतर करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे मुस्लिम जनता नाराज आहे. शहरातील मुस्लिम लोक औरंगजेबाला फॉलो करत नाहीत, पण तो इतिहासाचा एक भाग आहे. तो मिटवता येणार नाही. शहरात काही सुविधा नसताना फक्त श्रेय लाटण्यासाठी नाव बदलण्याचा घाट घातला जातोय, याला जनता उत्तर देणारच असे खा. जलील यांनी म्हंटले.