‘आम्ही कुठल्याही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही’; चव्हाणांचा पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. दरम्यान, भारत-चीन मधील तणाव राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर आज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. ‘जनतेचा आवाज म्हणून आम्ही चीनच्या मुद्द्यावरून आवाज उठवत आहोत. घरगुती कामासाठी आम्ही सरकारला प्रश्न विचारत नाही,’ असा खोचक टोला चव्हाण यांनी पवारांना हाणला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं आज साताऱ्यात आंदोलन केलं. त्यानंतर काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करू नये हे खरं आहे. मात्र, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळं आम्ही प्रश्न विचारतच राहणार. आम्ही कुठल्याही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही. लोकहिताच्या मुद्द्यावरच प्रश्न विचारत आहोत,’ असं चव्हाण म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?
‘काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२ च्या युद्धानंतर चीननं आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीननं सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. त्यामुळं आरोप करताना पूर्वी आपल्या काळात घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असं पवार म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment