बाळासाहेबांना माहित होतं, आपल्या पाठीमागे… ; दिघेंची Facebook पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक वर भलीमोठी पोस्ट शेअर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी दिघे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचा दाखला देत शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.

काय आहे केदार दिघे यांची पोस्ट –

शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब… जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा… याच उत्तर आज मिळालं! त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..? याच उत्तर आज मिळालं. दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं… आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील…

त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल…शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील…घरातील माणसं देखील विरोधात जातील.. कारण,शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते…

https://www.facebook.com/kedardighesaheb/posts/734057604743491

 

शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल…म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती…उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया…!

ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया…ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या! त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली… आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया…हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो… भलेही नेते गेले…,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल…पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल! काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे! असं म्हणत केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली आहे.