कराड। कडेगाव तालुक्यातील हणमंतवडीये येथील क्रांतिविरांगणा हौसाताई भगवानराव पाटील (वय- 96) यांचे कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या होत.
क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील या स्वतः स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होत. गोवामुक्ती संंग्रामासह प्रतिसरकार लढयात योगदान होत. वांगी डाकबंगला जाळण्यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग होता. जी. डी. लाड (बापू) यांच्या समवेत पणजी, गोवा येथून शस्त्रे आणली होती.
हाैसाताई यांचा भवानीनगर रेल्वे स्टेशनवरील पोलिसाच्या बंदूका काढलेल्या होत्या. मुंबईच्या सत्याग्रह, दिल्लीतील सत्याग्रह, प्रतापगडवरची निदर्शने, निपाणीचा सत्याग्रह सन 1965 पासून महागाई विरोधी कृती समिती मोर्चा, पाणी प्रश्न, ऊसदरा संदर्भात, दुष्काळी प्रश्न, ताकारी योजना पाणी लढा यासह अनेक ठिकाणी सतत आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या कैवारी असणाऱ्या क्रांतिविरांगना या अखेरच्या श्वास पर्यत लढत राहिल्या. क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील म्हणजे धगधगते अग्निकुंड होत्या. हा धगधगणारा अग्निकुंड अखेर निधनामुळे शांत झाला. प्रा. विलासराव पाटील व अँड. सुभाष पाटील यांच्या त्या मातोश्री होत.