टीम, HELLO महाराष्ट्र | मुंबईतील गणपती मंडळांपैकी सर्वाधिक लोकप्रिय गणपती म्हणजे लालबागचा राजा होय. भक्तांना आपल्याकडे आकर्षून घेणारे मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. हा गणपती ११ दिवसांसाठी स्थापन केला जातो आणि अनंत चतुर्थीच्या पवित्र दिवशी या गणपतीचे विसर्जन केले जाते. भक्तांची अशी एक श्रद्धा आहे की हा एक नवसाला पावणारा गणपती आहे. पण या गणपतीला नवसाला पावणारा गणपती का बरं म्हटलं जात? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली करण्यात आली. तेव्हा सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे १९३४ साली होडी वल्ववणाऱ्या दर्यासारंगाच्या रुपात श्री' ची स्थापना झाली. येथूनच
नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून या गणपतीला संबोधले जाऊ लागले.
१९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. १९४८ ते १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा चालू केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्री पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. गणेशोत्सवा दरम्यान प्रत्येक वर्षी 15 लाखाहूनही अधिक भक्तमंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात.