हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली. उण्यापुऱ्या ८ वर्षांचं आयुष्य असलेल्या या पक्षाने लोकसभा आणि महानगरपालिकेतील पराभव सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी मुसंडी मारली आहे. आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचं पानिपत करून आप ने दिल्लीचे शहेनशहा आपणच असल्याचं सिद्ध केलं. आपचे खासदार सुशील गुप्ता यांनी देशात आपचा विस्तार होईल याबाबतचं सूचक विधान केलं आहे. देशातील लोकांची इच्छा असल्यास आम्ही बाकी राज्यांतही निवडणूक लढू असं गुप्तांनी आज स्पष्ट केलं.
देशातील हिंदू मुस्लिम राजकारणाचा आता अंत होणार असून देशाच्या राजकारणात द्वेषाला कोणतीही जागा शिल्लक राहणार नाही असं मत आपचे राज्यसभा खासदार सुशील गुप्ता यांनी व्यक्त केलं. शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जगण्यातल्या मूलभूत सोयीसुविधांचं दिल्ली मॉडेल केजरीवाल यांनी इतर राज्यांसमोर मांडलं असून काम केलं तर जनता तुमच्या सोबत राहते हेच दिल्लीने दाखवून दिल्याचंही गुप्ता पुढे म्हणाले.