‘त्या’ बेपत्ता युवकाचा खून करून विहिरीत टाकला मृतदेह; दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या किरकोळ कारणांवरूनवादावादी होत आहे. मात्र, पुढे हीच वादावादी जीव घेण्यापर्यंत जात आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यात घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे उघड झाले असून संबंधित युवकाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सचिन नागनाथ धायगुडे (वय 35) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (दि.31) रोजी सचिनचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रदीप दत्तात्रय टेंगले व राहुल नामदेव धायगुडे (रा. डोंबळे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील डोंबाळवाडीतून सचिन धायगुडे हा युवक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी दि. 23 रोजी बेपत्ता झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली होती. त्यामुळे सचिन सापडत नसल्याने त्याचे नातेवाईक व पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह कॅनॉलशेजारील जलशुध्दीकरण केंद्रालगतच्या एका विहिरीत आढळून आला. ही बातमी गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. अनेक दिवस मृतदेह पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस वैधकीय अधिकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

सचिनचा वाद हा गावातील बोरी नावाच्या शेतातील शिवारात सचिन यांचा संशयित प्रदीप व राहुल यांच्याशी सायपन पाईप वापरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यानंतर सचिन बेपत्ता झाले होते. याबाबत सचिनचा दोघांशी वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र, गेले काही दिवस सचिनचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचा शोधच सुरू होता. मात्र, बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे आपला मोर्चा वळवला. पोलिसांनी दोघांनाही पकडून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.