औरंगाबादेत महाराष्ट्र बंद ‘फ्लॉप’; नेते आल्यावर तात्पुरती दुकाने केली बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेले शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादेत दुपारनंतरही फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. नेते-कार्यकर्ते आल्यावर तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली, मात्र नंतर शहरातील सर्वच ठिकाणची दुकाने सुरूच असल्याचे हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत दिसून आले.

शहरातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वतीने प्रमुख बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यात काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादीचे कैलास पाटील तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सिडको, हडकोसह औरंगपुरा, निराला बाजार, गुलमंडी आणि इतर भागातील व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले. तसेच ग्रामीण भागातही महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

शहरातील ज्या भागात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत, तेवढ्याच भागात दुकाने बंद ठेवली जात आहे. नेते-कार्यकर्ते गेल्यानंतर मात्र दुकाने पुन्हा सुरु केली जात आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ वगळता इतर भागातील कपडा, किराणा, सराफा अशी सर्व दुकाने सुरु आहेत. ऐन नवरात्रीच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केल्याने व्यापाऱ्यांनी त्याला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment