‘या’ कारणामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपकडून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असताना बुलडाण्यात मात्र भाजप विरुद्ध मनसे संघर्ष पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी आज पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत पोलिसांना निवेदन देण्यात आले. राज्यात आगामी नगरपंचायती आणि जल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे सध्या जोरदार तयारी करत आहेत. खळखट्याक अशी ओळख असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगू लागली आहे.

मनसेचा पोलीस स्टेशनवर मोर्चा
बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसात आरोपींना अटक करा , अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करू असा इशारा दिला होता. मात्र तरीदेखील पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नव्हती. यामुळे जखमी अजय खरपास यांचे नातेवाईक सह धनवट समाजाने एकत्रित येत चिखली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारासह पोलीसाना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांना प्रकरण भोवणार?
काही दिवसांनी राज्यात महानगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सध्या राज्यभर दौरे सुरु आहेत. भाजपसुद्धा या निवडुकीत पूर्ण तयारीनिशी उतरले आहे. स्थानिक लेव्हलच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकांकडे लक्ष असते. या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसे आणि भाजपमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या पोस्टवर आक्रमक होत भाजप कार्यकर्त्यांनी केलेली ही मारहाण आता भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment