नागपुरातून सरकार चालत नसते – मोहन भागवत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्याचा कानमंत्र देत नाही, मात्र राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं’ असं मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली येथील ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संघ सरकारच्या कामकाजात दखल देत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना, ‘अनेक लोक आरोप करतात की नागपुरातून फोन जातात. मात्र हे पूर्णतः खोटे आहे. नागपुरातून सरकार चालत नसते’ असे म्हणत भागवत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

आरएसएस राज्यघटनेचा आदर करत असून, त्यानुसारच आम्ही चालतो असंदेखील भागवत यांनी म्हटलं आहे. ‘आम्ही कधीही राज्यघटनेविरोधात जाऊन कोणते काम केलेले नाही’ असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं.

‘केंद्रात काम करणारे अनेकजण स्वयंसेवक आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती आरएसएसचे स्वयंसेवक राहिले आहेत. या मुद्द्यांवर अनेकदा चर्चा होत असते. खरंतर हे सगळे माझ्या वयाचे आहेत, मात्र राजकारणात मला सीनिअर आहेत. संघ कार्याचा मला जितका अनुभव आहे, त्याहून जास्त त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांना राजकीय वाटचालीसाठी कोणत्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही तो देऊही शकत नाही’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरकारच्या धोरणांवर संघाचा कोणताही प्रभाव नसल्याचंही मोहन भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment