व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Monsoon Tourism : पावसाळ्यात पर्यटनाचा बेत आखताय? माळशेज घाटातील सफर ठरेल बेस्ट; कुठून व कसं जायचं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झाले असून पावसाळ्याच्या या दिवसात मित्र- मैत्रिणीसोबत किंवा नातेवाईकांसोबत कुठेतरी फिरायला जावं अशी इच्छा अनेकांची असते. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पावसाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यावा आणि आयुष्यातील सर्व दुःखे किंवा टेन्शन यापासून काहीकाळ तरी दूर व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच ते काही चुकीचे नाही. त्यामुळे अनेक जण पावसाळ्याच्या सुरुवातीलाचा पर्यटनाचा बेत (Monsoon Tourism) आखतात. तुम्ही सुद्धा अशाच एका ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एक निसर्गरम्य परिसराबाबत सांगणार आहोत जे मुंबई- पुणे आणि अहमदनगर या तिन्ही शहरांपासून समान अंतरावर आहे. या पर्यटन स्थळाचे नाव आहे माळशेज घाट…..

 Malshej Ghat

उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस, मनमोहक धबधबे, उंच उंच किल्ले हिरव्यागार टेकड्या अशी मनमोहक दृश्ये पाहायची असतील तर कल्याण अहमदनगर मार्गावरील माळशेज घाट पर्यटकांसाठी नक्कीच बेस्ट पर्यटन स्थळ ठरेल यात शंकाच नाही. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी जाऊन आपल्या जोडीदारासोबत चिंब भिजण्यासाठी अनेकजण मोठी गर्दी करतात. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून वीकेंडला जाण्यासाठी माळशेज घाट नक्कीच एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे.

 Malshej Ghat

माळशेज घाटातील नैसर्गिक ठिकाणी पिंपळगाव जोगा धरण सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच याठिकाणी तुम्हाला फ्लेमिंगो, ग्रीन कबूतर, अल्पाइन स्विफ्ट यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सायबेरियातून स्थलांतरित होणारे शेकडो फ्लेमिंगो पक्षी माळशेज घाटात तुम्हाला दिसतील. तसेच तुम्हाला आजोबा टेकडीचा किल्ला, हरिश्चंद्रगडावरील कोकम काड़ा साइट, माळशेज धबधबा यांसारखी अन्य ठिकाणेही पाहता येथील.

 Malshej Ghat

माळशेज घाटात जायचं कसं? (Monsoon Tourism)

माळशेज घाटापासून जवळ असलेली शहरे म्हणजे पुणे, कल्याण, ठाणे. याठिकाणी तुम्ही बस किंवा खासगी टॅक्सीने जाऊ शकता. रस्ते चांगले असल्याने आणि परिसर निसर्गरम्य असल्याने प्रवासात सुद्धा तुम्हाला फक्त आनंदच मिळेल. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये – जा करत असतात. जर तुम्ही वरील तिन्ही शहरांपासून लांब राहत असाल आणि माळशेज घाटापर्यंत रेल्वेने प्रवास करू इच्छित असाल तर तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन किंवा कल्याण रेल्वे स्टेशनपर्यत जावं लागेल आणि तेथून दुसऱ्या खासगी गाडीने माळशेज पर्यंत जावं लागेल.