‘बधाई हो’ बधाई… बघा आणि रडा, अगदी मन मोकळं करून …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिनेमा रिव्हीवू | चित्रपट पहायचा म्हणजे फक्त २-३ तास वेळ घालवायचा असं नव्हे, तर जगाचा अनुभव २-३ तासात मिळवण्याचा हमखास पर्याय होय. माझ्यासाठी सिनेमा कसा आहे हे ठरविण्याचे मोजमाप म्हणजे तो सिनेमा मला किती रडवतो हे होय…

” बधाई हो ” बघितला, लय रडलो. हम, हम, हं मी रडताना शेजारचा माझ्याकडे पाहतो आहे की नाही याची पर्वा न करता रडलो आणि कायम तसाच रडतो. इन मिन १०-२० माणसांभोवती फिरणारा हा सिनेमा आपल्या सभोवतालची माणसं हे आपलं जग असतं. ती चांगलीच असतात, पण काही कारणांमुळे आपल्याला नकोशी वाटतात, त्यांचा राग येतो. पण काही समांतर घटनांमुळे आपल्याला ती नाती उलगडू लागतात. सिनेमामध्ये खऊट सासू अाहे. अगदी बाळंतपणाच्यावेळी सुनेने माहेरचं पाणी पिल्यामुळे हे पोरगं असं जन्मलं असं बोलायला ती मागेपुढे पाहत नाही. पण एका ठिकाणी ती म्हातारी असा काही डायलॉग मारते कि “बेटा तुझ्या बापाने हिला सून म्हणून आणली आणि माझ्या म्हातारपणाची सगळी सोय केली. अख्या खानदानात माझं औषध, माझं आजारपण , आजारपणातली घाण काढणं सगळं सगळं आजपर्यंत ह्या सुनेनं केलं. व्वा, आपल्यात असणारी सून रडल्याशिवाय राहणार नाही.”

एक सचिनचा किस्सा सांगतो, त्यानेच सांगितलेला. सचिन तेंडुलकरने इतकी शतकं काढली पण गुरु रमाकांत आचरेकर यांनी कधीही खूप मस्त खेळाला असं सचिनला बोलले नाही. म्हणून सचिनला आपल्या गुरूंबद्दल आदर, प्रेम काही कमी झाले नाहीे, असो. आपले कान जणू कौतुक ऐकण्यासाठीच असतात, पण कधीही न उच्चारलेले कौतुकाचे बोल हे ऐकायचे असतात. न आपण आपले काम करत राहायला शिकलं पाहिजे. दुसरं नातं म्हणजे मित्र. मित्र म्हणजे एकमेकांची नुसती खेचा खेची. आपला हिरो आयुष्मान खुराणा मित्रांची सतत खेचत असतो आणि ज्यावेळी मित्रांची वेळ येते त्यावेळेस त्याची फजिती विशेष बघण्यासारखी असते.

एकदा तो तावडीत सापडतोच. पण मित्र मित्र असतात, खेचा-खेचीचा शेवट एकतर चहा मध्ये होतो नाहीतर सिगारेटमध्ये…. कोणताही मित्र खेचा-खेचीचे मैदान सोडून पळून जात नाही. एका सीनमध्ये तर लहान भाऊ आणि मोठया भावामधला एक शॉट लै सेन्टी घेतलाय. वडिलांच्या एका गोष्टीमुळे दोघं नाराज असतात. बोलता बोलता मोठया लहान्याला म्हणतो “ए उल्लू के पट्ठे .” लहान भाऊ म्हणतो ए माझ्या बापाला काही बोलायचं नाही. मोठापण मग “अरे तेरा और मेरा बाप तो एकही है.” आणि मग काय दोन भाऊ आणि बापामधला कडूपणा एकदमच कमी होतो. मोठ्याने लहान्याला शाळेसाठी पैशाची मदत करणे, दारू पिण्याचे तत्वज्ञान सांगणे असं सगळं ह्या सिनेमा मध्ये पहायला मिळतं.

सिनेमाचे खरे हिरो आणि हिरोईन तर नीना गुप्ता आणि तिचा नवरा गजराज राव. यांचा अभिनय हा संपूर्ण चित्रपटगृहात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अतिशय अप्रतिम अभिनय हया दोन ज्येष्ठ कलाकारांनी साकारला आहे. त्यांचे ते पाहणं, ते कविता म्हणून दाखवणं, तो पावसाचा आवाज, वातावरण झुंझू-मुंझू होणं , मस्त जमलंय. आई-बाप न मुलं- तरुण हिरोचं, जॉबसाठी अमेरिकेला जाणार नाही, आम्ही टिपीकल मिडल क्लास कुटुंब आहे असं होणाऱ्या सासूला सांगणं हे स्वतःच्या कुटुंबावर प्रेम व्यक्त करतं. एकदा तर दारू पिऊन हिरो तिला काही-बाही बोलतो. पण गाडी, बंगला, नोकर-चाकर असलेली हिरोईनची आईसुद्धा सगळा राग गिळून , त्या आयुष्मान खुराणाच्या एक सॉरीवर आपल्या मुलीसाठी “जा सिमरन जा , जी ले अपनी जिंदगी ” टाइप उचभ्रु पण प्रेमळ सासू रेखाटली आहे.

हिरो न हिरोईन, नकुल आणि रिनी हिरोईन समजदार आहे , जे आहे ते आहे आणि पुढे चला असा चांगला ऍटिट्यूड बाळगणारी. दोघात छोट्याश्या भांडणातून मोठी भांडणं, मग माघार कुणी घ्यायची. एकाच ऑफिसात, एकाचे तोंड इकडं तर दुसऱ्याचं तिकडं. आपल्या आवडीच्या माणसाबरोबर भांडणं झाला कि आपल्या फोनचा उपयोग तसा शून्य असतो. ना कुणाचा कॉल, ना मेसेज. एक माणूस गायब झाला तर कॉन्टॅक्ट लिस्टमधले हजारो माणसं गायब होतात की काय असं होतं. आपण जिवंत आहोत की नाही हे फोनला हाताळून , एखादा मेसेज टाईप करून , टाईप केलेला I Miss You चा मेसेज डिलीट करून पाहावा लागतो. कधी Sorry तर कधी I love you लिहावं वाटतं. हि सगळी घालमेल ह्या सिनेमामध्ये मस्तपैकी रंगवली आहे. ती कॉल करेल किंव्हा तो मेसेज करेल असं दोघांना वाटत राहतं. त्यात सान्या ( रेनी) सारखी लै भारी नाक असलेली नायिका असेल तर I Miss you लिहा आणि पाठवाच.

बाकी चित्रपट आणि आपलं आयुष्य म्हणजे आपली माणसं, खाणं-पिणं, सॉरी , I MISS U होय. मी तर हजारो वेळा सॉरी बोललोय आपल्या माणसांसाठी. शेवटी जग म्हणजे काय ? तर आपली माणसं फक्त… चित्रपट बघताना बिनधास्त रडा , आपल्या माणसांसाठी रडा …त्या रडण्यातच खरी “बधाई हो ” लपलेली आहे. पिच्चर पहा भांडण विसरा आणि तेवढा फोन नाहीतर मेसेज करा आपल्या माणसाला …
मग करताय ना ?

दिग्दर्शन – अमित शर्मा
निर्माते- विनीत जैन, आलेया सेन, हेमंत भंडारी.
सहनिर्मात्या – प्रीती शहानी
कलाकार – आयुष्मान खुराणा, सान्या मल्होत्रा, गजराज राव, नीना गुप्ता, सुरेखा सिकरी.

Madhav Patil

माधव पाटील.
मी पाणी फाऊंडेशन ‘अंघोळीची गोळी’
८७९६५७२७६६

Leave a Comment