औरंगाबाद । कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं पाहून राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन उठवणार का? यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये. पण आता महाविकास आघाडी सरकारने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही १ जुनपासून औरंगाबादेतील दुकाने उघडणारचे, असा थेट इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रशासन मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहेरबानी करत आहे, तर छोट्या व्यापाऱ्यांना मात्र दंड ठोठावत आहे. शनिवारी गुलमंडीत मिलन मिठाई भांडारचे सील दोन तासांत काढण्यात आले. मात्र, इतर गरीब व छोट्या व्यापाऱ्यांना दंड ठोठावणे, दुकाने सील करण्याची बळजबरी का केली जात आहे. प्रशासनाने छोट्या दुकानांचे सील उघडले नाही तर गरीब छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने मी स्वत: उघडायला येईल’, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
ते म्हणाले, ‘छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे सील काढण्याचे निवेदन आमदार प्रदीप जैस्वाल व मी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु काही राजकीय नेत्यांनी दुकान उघडण्यास विरोध केला. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. बँकेचे हप्ते फेडू न शकल्याने एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. ही गंभीर बाब आहे. खासगी बँका गुंडांकरवी कर्जाचे हप्ते बळजबरीने वसूल करू लागले आहेत. यावेळी जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू अशा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.