महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. या मार्गाचा शेवटचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. 700 किलोमीटरहून अधिक लांबीचा हा महामार्ग मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा असून, महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा टप्पा ठरणार आहे.वाहतुकीसाठी लवकरच संपूर्ण महामार्ग खुला केला जाणार आहे.
सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत (625 किमी) वाहतूक सुरू आहे. उर्वरित इगतपुरी ते मुंबई (76 किमी) टप्प्याचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या महामार्गावर आवश्यक ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. मुंबई आणि नागपूर हे दोन महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्रं थेट जोडले जात आहेत. महामार्गामुळे औद्योगिक वसाहती, वाहतूक सेवा, कृषी व्यवसाय, पर्यटन, आणि नव्या गुंतवणुकींना मोठी चालना मिळणार आहे.
सध्या मुंबई ते नागपूर प्रवासाला 16 तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 7 तासांत पूर्ण होईल.
यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, व्यापार, उद्योग आणि पर्यटनासाठी मोठी मदत होणार आहे.महत्त्वाची भौगोलिक कनेक्टिव्हिटी या मार्गामुळे निर्माण होणार आहे.
10 प्रमुख जिल्ह्यांमधून जातो मार्ग
नागपूर,वर्धा,अमरावती,वाशिम,बुलढाणा,जालना,औरंगाबाद,नाशिक,अहमदनगर,ठाणे याशिवाय, हा महामार्ग 14 अतिरिक्त जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडणार आहे यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, रायगड यांचा समावेश असेल.
पर्यटनाला चालना मिळणार
महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे, जसे की शिर्डी,बीबी का मकबरा, औरंगाबाद,सुला वाईनयार्ड, नाशिक,त्र्यंबकेश्वर शिव मंदिर,तानसा वन्यजीव अभयारण्य,पेंच नॅशनल पार्क,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
अत्याधुनिक आणि सुरक्षित महामार्ग
हा महामार्ग देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे.
महामार्गाच्या संपूर्ण रस्त्याला अत्याधुनिक रचना आणि सुरक्षिततेचे सर्व निकष पाळले गेले आहेत.
वन्यजीवांसाठी विशेष अंडरपास आणि ओव्हरपास उभारले असून, पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावरील संरचना व सुविधा
319 अंडरपास,307 पूल,65 उड्डाणपूल,6 बोगदे,8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज, 33 मोठे पूल व 274 छोटे पूल, 110 हलक्या वाहनांसाठी अंडरपास
महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा (8 किमी) इगतपुरी येथे बांधण्यात आला असून भारताचा सर्वात रुंद 17.5 मीटरचा बोगदा याच महामार्गावर आहे.
हेलिपॅड सुविधा – आपत्कालीन सेवा सज्ज
महामार्गावर एकाचवेळी 4 हेलिकॉप्टर उतरू शकतील अशी हेलिपॅड सुविधा तयार करण्यात आली आहे.
यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य जलद गतीने होऊ शकते.