खळबळजनक!!! फक्त आंघोळीच्या पाण्यासाठी केला खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परतुर/ प्रतिनिधी – परतूर तालुक्यातील बाबूलतारा (जि. जालना) येथे अंघोळीसाठी गरम पाणी टाकण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून एकाने पत्नीसह सासूला जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघींवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दी.२ एप्रिल रोजी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित जावयास अटक केली आहे. रेशम कोळे (६०) असे मृत महिलेचे नाव आहे.

या संदर्भात संशयिताची पत्नी कविता संतोष सरोदे (३५, रा. बाबूलतारा) यांनी परतूर पोलिसांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ष २००६ मध्ये आईने संतोष भीमराव सरोदे (रा. रामनगर) याच्याशी आपले लग्न लावून दिले होते. आम्हाला तीन मुली व एक मुलगा आहे. पती संतोष याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तो मला नेहमी मारहाण करायचा. नवऱ्याने मारहाण करून घरातून हाकलून दिल्यामुळे मी चार वर्षांपासून मुलांसह बाबूलतारा येथे आईच्या घरीच राहते. मजुरी करून पोट भरते. मागील दिवाळीपासून पती संतोष सरोदे आमच्यासोबतच आईच्या घरी राहत आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पतीने मला अंघोळीसाठी गरम पाणी टाकण्यास सांगितले. गरम पाणी टाकण्यास उशीर झाल्याने आमच्यात वाद झाला.

त्यानंतर पती अंघोळ व जेवण करून घरातून निघून गेला. शेजारी राहणाऱ्या मुलीचे लग्न असल्याने आपण आईसह लग्नात जेवण करून रात्री मुलांसह घरी परतलो. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पती संतोष सरोदे हा रामनगरहून दुचाकीने घरी आला. लग्नाहून आले का, असे विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक हातात कोयता घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर हल्ला केला.

आपण आरडाओरडा केल्याने आई रमेश कोळे मला वाचण्यासाठी मध्ये आली असता, पतीने आईच्या डोक्यात, पाठीवर, हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. आम्ही दोघी खाली पडल्यानंतर पती घटनास्थळावरून पळाला. आजूबाजूच्या नागरिकांनी मला व आईस खाजगी गाडीत टाकून उपचारासाठी जालना येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने दोघींना अधिक उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवले. तिथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आईचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या घटनेनंतर पळून गेलेल्या संशयित संतोष सरोदे यास परतूर पोलिसांनी तपासचक्र फिरत दोन तासात अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे अधिक तपास करत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment