कोझिकोड विमान दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू; AAIB कडे अपघाताच्या तपासाची सूत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अँक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“कोझिकोडमध्ये झालेल्या विमान उपघाताचं दु:ख झालं आहे. AXB-1344 हे विमान १९१ प्रवाशांसह दुबईवरून कोझीकोड या ठिकाणी येत होतं. पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि विमानाचे तुकडे होण्यापूर्वी ते ३५ फुट खाली गेलं,” अशी माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली. तसंच आपण स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मुंबई, दिल्लीवरून मदतीसाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत. एआयबीद्वारे या घटनेचा तपास केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अशी घडली विमान दुर्घटना
दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचं A737 बोईंग विमान संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरताना घसरले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३५ फुटी खड्यात जाऊन कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू एवढे जण होते, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment