पृथ्वीराज बाबांच्या बाबत सोशल मीडियावरील ‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे व निरर्थक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशभरातील काँग्रेस आधीच अडचणीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कराड तालुक्यातील एका फ्लेक्सच्या फोटोवरून तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशी भूमिका कराड दक्षिण तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे मांडली. याबाबतचे एक पत्रक त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच सोशल मीडिया मध्ये खोडसाळपणा करून अपप्रचार करणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज बाबांनी कराड शहरात कोट्यावधीची विकासकामे आणली आहेत त्याचप्रमाणे एका विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी 4 ऑगस्ट 2022 रोजी पृथ्वीराज बाबा कराड शहरातील एका कार्यक्रमांस गेले होते त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला होता त्या जुन्या बॅनर चा आधार घेऊन सोशल मीडिया वर सद्या पृथ्वीराज बाबांच्या बाबत अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे पसरवलेले वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशी भूमिका कराड दक्षिण तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे मांडली.

सोशल मीडिया वरील चुकीच्या बातमीची कोणतीही सत्यता न तपासता फक्त आपले दर्शक वाढून आपल्या पोर्टल चा फायदा व्हावा या प्रसिद्धीच्या हेतूने एका पत्रकाराने लावलेल्या या चुकीच्या बातमीचा व त्या पार्टल चा मी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करतो असेही यावेळी मनोहर शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले कि, मुळात 4 ऑगस्ट च्या कार्यक्रमानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यक्रम पृथ्वीराज बाबांनी पुढाकार घेऊन केलेले आहेत. यामध्ये जिल्ह्यात काढण्यात आलेली तिरंगा यात्रा ही यात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाकडून देशभर काढण्यात आली होती व यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 कि. मी. यात्रा आयोजित केली होती. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पृथ्वीराज बाबा स्वतः हजर राहीले होते तसेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यांचा इतिहास सगळ्यांना जाहिर कार्यक्रमातून सुद्धा ते सांगत होते या रॅलीनंतर काँग्रेस पक्षाने दिल्ली येथे आयोजित केलेली महागाई च्या विरोधातील रॅली मध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सोबत सहभागी झाले होते. व्यासपीठावर सर्व नेत्यांच्या सोबत ते उपस्थितही होते. आणि आता सुद्धा भारत जोडो यात्रा जी निघाली आहे ती यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात येईल त्यावेळी बाबा स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहेत.

मध्यंतरीच्या काळात पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस पक्षाबद्दल जी भूमिका मांडली होती ती पक्षाच्या वाढीसाठी धोरणात्मक अशी भूमिका होती त्याचा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठिनी विचार करून त्याप्रमाणे पक्षांमध्ये निवडणूक कार्यक्रम सुद्धा आखला आहे. पृथ्वीराज बाबांचा राहुल गांधींना कधीच विरोध नव्हता अशी अनेक उदाहरणे सत्ता असताना सुद्धा घडली आहेत जिथे बाबांनी राहुल गांधींना पुढाकार घ्यायला सांगितले होते परंतु चुकीच्या बातम्या पसरवून बाबांच्या भूमिकेचा अपप्रचार चालवीला जात आहे. त्यामुळे कराड मध्ये सोशल मीडिया वरून जे काही जुने फोटो लावून कोणतीही तथ्यता न तपासता व्हायरल मेसेज पाठविले जात आहेत व बातम्या केल्या जात आहेत त्याचे पूर्णपणे खंडन काँग्रेस पक्षाचा एक तालुकाध्यक्ष म्हणून मनोहर शिंदे यांनी यावेळी केले.