भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसने उघडली ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विरोधकांच्या मागण्याकडे कानाडोळा करणाऱ्या भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसकडून ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला आज सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते समर्थक आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. या मोहिमेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा तसंच काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मोठे नेते सहभागी झाले आहेत.

काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, या मोहिमेत ५० लाखांहून अधिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होत आहेत. आर्थिक परिस्थिती, स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न तसंच बेरोजगारी या संकटांवर ‘स्पीक अप’मध्ये चर्चा केली जाणार आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेस मोदी सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या मांडत आहे. स्थलांतरीत मजुरांना मोफत त्यांच्या घरी पोहचवण्यात यावं तसंच त्यांना १० हजार रुपयांची तत्काळ मदत पुरवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

तर दुसऱ्या मागणीद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तत्काळ आर्थिक सहाय्य देण्याची मागणी काँग्रेसनं मांडली आहे. याशिवाय मनरेगामध्ये कामाचे दिवस वाढवून वर्षातून २०० दिवस करण्याची मागणीही विरोधी पक्षानं केली. सुरुवातीला वर्षांत १०० दिवसांची रोजगार हमी देणाऱ्या या योजनेत दिवसांची वाढ करून अगोदर वर्षात १२० दिवस आणि नंतर वर्षाला १५० दिवसांची रोजगार हमी या योजनेद्वारे देण्यात आली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, यांच्यासहीत पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment