लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच वारीसाठी पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 साली वारकऱ्यांचं पायी पंढरपुरला जाण्याचे आणि वारी पूर्ण करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. यंदा ही 2021 साली पायी वारीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. 27 जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरी देखील वारकरी पायी वारीचा आग्रह धरतात. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच प्रवेश

पंढरपूर मध्ये प्रवेश करताना वाखरी इथं सर्व वारकर्‍यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूर मध्ये प्रवेश दिला जाईल असं नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनी देखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचे गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायी वारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

याबाबत बोलताना नगराध्यक्षांनी म्हटलं की, पंढरपुरात आतापर्यंत 24 हजार 731 जणांना कोरोना संसर्ग झाला तर सध्या 555 जणांवर कोरोना उपचार सुरू आहेत. 480 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे अद्याप नागरिकांमध्ये कोरोना बद्दल भीती आहे. पंढरपुरात यंदा सहा दिवस पालख्यांचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येताना गर्दी करतील त्याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी केवळ दोन डोस पूर्ण झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

दहा महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळा संदर्भातील नियमावली जाहीर केली यावेळी आषाढी वारी बाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून केवळ दहा महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच देहू आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित आठ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

Leave a Comment