धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आले होते. विराट कोहलीने केलेल्या १०७ धावांच्या जोरावर भारताने हा सामना ७६ धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत कोहलीच्या खेळीबरोबरच सुरेश रैनानेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेगवान ७४ धावा फटकावल्या. अशाप्रकारे ५ किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रैनाने तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक फलंदाजीच्या क्रमवारीत बदल घडवल्याबद्दल सांगितले.

रैनाचा असा विश्वास आहे की या शानदार खेळीचे श्रेय संपूर्णपणे धोनीला जाते. धोनीने अचानक निर्णय घेतला की रैना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल तर त्यावेळी अजिंक्य रहाणे ६व्या क्रमांकावर खेळेल. त्याविषयी रैनाने एका यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, ‘मी त्याच्या निर्णयावर कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. २०१ ५ च्या विश्वचषकात आम्ही पाकिस्तानविरूद्ध सामना खेळत होतो, मी बसून सँडविच खात होतो, त्यानंतर २० षटकांनंतर धोनी आला आणि पॅड घालून तयार होण्यास सांगितले. मी पॅड घालून फलंदाजीसाठी सज्ज झालो. विराट जबरदस्त फलंदाजी करत होता, इतक्यातच धवन रनआऊट झाला आणि मी चौथ्या क्रमांकावर खेळायला गेलो. मी ७०-८० धावा केल्या असतील. ‘

विशेष म्हणजे जेव्हा रैना फलंदाजीला आला होता तेव्हा भारताची धावसंख्या २९.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १६२ झालेली होती. रैनाने ५६ चेंडूत ७४ धावा फटकावल्या. त्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने विराट कोहलीबरोबर ११० धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारत मजबूत धावफलक उभा करण्यास यशस्वी झाला. अशाप्रकारे धोनीची योजना स्पष्ट करताना रैना म्हणाला, ‘सामना संपल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला विचारले की,” फलंदाजीच्या क्रमात मला वर का पाठवले ? तो म्हणाला की,” तू लेग स्पिनरविरुद्ध चांगले खेळतो आणि त्यावेळी फक्त लेग स्पिनर गोलंदाजी करीत होता. त्यानंतर धोनीने माझ्या फलंदाजीचेही कौतुक केले.

अशाप्रकारे, धोनीचा हा मास्टर प्लॅन रैनासाठी अत्यंत प्रभावी ठरली आणि त्यावेळी त्याने पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहला चांगलेच बडवले तसेच सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. भारताने या सामन्यात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३०० धावा केल्या आणि पाकिस्तानचा डाव मात्र २४४ धावांतच आटोपला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment