हा तर शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’ ; लव्ह जिहाद वरून सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. तसंच सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय.

“10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा आहे. तर 21 नोव्हेंबरचा सामना म्हणतो लव्ह जिहादमध्ये गैर काय आहे? यावरुन शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग दिसून येतोय”, अशी खरमरीत टीका सोमय्या यांनी केली आहे.

“युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शिवसेनेने सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. “लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा आहे. शेवटी लग्न करताना मुलगा आणि मुलीची पसंती महत्त्वाची असते. मात्र, भाजप यावरुन केवळ राजकारण करू पाहत आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.

त्यानंतर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला. अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात”, अशी टीका सोमय्यांनी केली. यूपी सरकारने केलेल्या कायद्यानुसार महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा असा प्रस्ताव आम्ही विधानसभेत मांडणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment