पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन खडसेंनीच करावे ; गिरीश महाजनांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. भाजप सोडताना खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खुलासा खडसेंनी केला. यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले असून खडसेंचा हा कांगावा अत्यंत चुकीचा असून पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील, असा हल्लाबोल केला आहे.

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळच्या परिस्थितीसाठी फडणवीस कसे जबाबदार असतील. भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा सामूहिक असतो. मात्र, फडणवीस यांना टार्गेट करणे खडसेंना सोपे वाटत असावे, असा टोलाही महाजन यांनी हाणला.

खडसे यांच्याबाबत जे निर्णय घेण्यात आले, ते एकट्या देवेंद्र फडणवीस यांचे नव्हते, ते सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचे होते. फडणवीस हे नेते असल्याने त्यांनी त्याची अंमलबजावणी केली एवढेच. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन म्हणाले.

तसेच खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जळगाव जिल्ह्यात भाजपला काहीही फरक पडणार नाही. असेही ते म्हणाले. भाजप व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जिल्ह्यातील जनता भाजपसोबत कालही होती, उद्याही राहील. मी आज काही बोलणार नाही पण भाजपमध्ये असताना पक्षाविरुद्ध कुठे कुठे कोणी काय काय केले ते योग्यवेळी सांगेन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment